Sunday, December 4, 2022

चिऊ-काऊ आणि मानवी सहजीवन

 चिऊ-काऊ आणि मानवी सहजीवन


फोटो - डॉ. विधिन कांबळे (Photo - Dr. Vidhin Kamble) 

फोटो - डॉ. विधिन कांबळे (Photo - Dr. Vidhin Kamble) 
लाखो वर्षापूर्वी माणसाने जेंव्हा शेती करण्यास सुरुवात केली असेल तेव्हा त्या पहिल्या शेतकऱ्याच्या शेतात एखादी चिमणी कंणसातील दाने टिपण्यासाठी आली असावी. घाबरत-घाबरत ती एखाद्या कणसावर बसली असावी. तिने इकडे-तिकडे पहिले असले आणि घाबरत-घाबरतच कणसातील दाने आपल्या इवल्याश्या चोचीने टिपले असतील.  असे तिने अनेक वेळा केले असावे. मग ती थोडी धीट झाली असावी. मग ती रोज येऊ लागली असेल आणि मनसोक्त दाने टिपली असतील. वणवण भटकंती करण्यापेक्षा एकाच जागेवर मुबलक खाद्याची सोय झाल्यामुळे ती शेताच्या आसपासच वावरू लागली असावी. त्या चिमणीने पहिल्या शेतकरी कुटुंबाच्या झोपडी जवळ एखाद्या झाडावर निवारा शोधला असावा.  त्यावर आपले घरटे बनवले असावे. त्या घरट्यात अंडी घालून पिलांना जन्म दिला असावा. कदाचित तिने जाणले असावे, की आपल्या येणाऱ्या पिढीला अन्नपाण्यासाठी भटकत फिरावे लागणार नाही.

चिमणीने दाने टिपता-टिपता शेतकऱ्याच्या पिकावर आलेले उपद्रवी किडे फस्त केले असावेत. त्याच्या पिकाचे रक्षण इवल्याशा चिमणीकडून होत आहे ही बाब त्या शेतकऱ्याच्या लक्षात आली असावी. त्यातूनच मग माणसाचे आणि चिमणीचे हळुवार नाते आणखी घट्ट बनले असावे.  त्या शेतकऱ्यालासुद्धा चिमणीची सवय झाली असावी. चिमणीलाही मानवी सहवासाची सवय जडली असावी. आणि तेव्हापासून आजपर्यंत चिमणीचे मानवाशी अतूट नाते बनले असावे. आणि तेव्हा पासूनच ती मानवी वस्तीच्या आसपास रेंगाळत राहिली असावी.

एक दिवस चिमणी आपल्या चिमुकल्या पिलांना घेऊन कणसातील दाने चारण्यासाठी घेऊन आली असावी. चिमणा-चिमणी आपल्या पिलांना घास भरवताना त्या शेतकऱ्याच्या मुलांनी पहिले असेल. त्यांना खूप गंमत वाटली असावी व त्यांनी आनंदाने उड्या मारल्या असतील. व शेतकऱ्याला सुद्धा आपली मुले आनंदाने नाचत असताना पाहून आनंद झाला असेल.  मग शेतकऱ्याने एक शक्कल लढवली असेल. त्याने आपल्या झोपडीच्या अंगणात धान्य पसरून ठेवले असेल. एका छोट्याशा भांड्यात पाणी ठेवले असेल. मग चिमणी दररोज आपल्या पिलांना घेऊन दाने टिपण्यासाठी अंगणात येऊ लागली असेल. हळूहळू चिमण्यांची संख्या वाढत गेली असेल. पुढे थव्याने चिमण्या अंगणात येऊ लागल्या असतील. तो शेतकरी व त्याचे कुटुंबीय नित्यनेमाने चिमण्यासाठी चारा पाण्याची सोय करत असतील.  त्यामुळे त्याचा लहान मुलांनाही चिमण्यांचा लळा लागला असावा.

पुढे एखादा कावळा भटकत-भटकत त्या शेतकऱ्याच्या झोपडीजवळ आला असावा. त्याला घराच्या आसपास मांसाचे तुकडे, हाडे, अंड्याची टरफले, खरकटे-मरकटे सांडलेले दिसले असेल. त्याच्यावर कावळ्याने यथेच्च ताव मारला असेल. आणि मग तो नित्यनेमाने मिळेल ते खाण्यासाठी अंगणात येऊ लागला असेल. एखाद्या दिवशी त्याला काहीच खायला मिळाले नसेल. मग कावळा अंगणातील झाडाच्या फांदीवर बसून काव-काव करीत बसला असेल.  त्याची काव-काव ऐकून शेतकऱ्याच्या बायकोने त्याला खाण्यासाठी काही तरी दिले असेल. त्या दिवसापासून तो कावळा रोज येऊ लागला असेल.  काव-काव करीत मिळेल ते खात असेल. हे पाहून त्या शेतकऱ्याच्या मुलांना खूप मजा वाटली असेल.

सर्वत्र हिरवेगार जंगल असेल.  त्या जंगलात मोठमोठी झाडे असतील. झुळू-झुळू वहाणारा झरा असेल. मुले त्यामध्ये डुंबण्याचा आनंद घेत असतील. किंवा खेळण्यात गुंग झाली असतील. ते तहान -भूक विसरून दंगा-मस्ती करत राहिले असतील. खूप वेळ खेळत राहिले असतील. त्यांची आई हैराण झाली असेल.  त्यांच्या आईने आपल्या लेकरांना जेवणासाठी बोलावले असेल. पण त्या चिमुकल्या मुलांनी त्याकडे लक्ष दिले नसेल. मग त्यांच्या आईने “ बघ ती चिमणी आली ! असे म्हटले असेल. त्यामुळे तिची चिमुकली दुडू-दुडू धावत आली असतील. आणि तिने एक घास आपल्या बाळांच्या तोंडात घातला असावा.  आणि ती म्हणाली असेल. “ हा घास चिऊचा” . पुन्हा ती म्हणाली असेल “हा घास काऊचा” चिऊ-काऊचा घास म्हणत त्यांनी खूप मजेत जेवण केले असेल. मग हे रोजचेच झाले असावे. ते आज पर्यंत चालू आहे.

माझ्या अंगणी ये ग चिमणाबाई

लहानपणी चिऊ-काऊच्या गोष्टी ऐकल्याशिवाय लहान बाळाचा घास घश्याखाली उतरत नसे. “एक घास चिऊचा” “एक घास काऊचा” ऐकत ऐकत लहानाचे मोठे झालो त्या चिमणीचे आणि कावळ्याचे आपल्या बालपणावर मोठे उपकार आहेत. कारण चिमणीकडे बघत-बघत लहानाचे मोठे कधी झालो हे कळले नाही. पण आज तीच मंडळी आज आंधळी झाल्यासारखी वाटतात. कारण आपले अस्तित्व टिकवण्यासाठी  धड्पाडणाऱ्या चिमुकल्या चिमणीचा आवाज त्यांच्या कानाला ऐकू येईनासा झालाय.   चिमणी आणि कावळ्याचे माणसाशी हजारो वर्षाचे नाते आहे.  इतर पक्ष्यापेक्षा चिमणी आणि कावळ्याचे अस्तित्व व वास्तव्य माणसाच्या आसपास दिसून येते. म्हणूनच त्यांचे माणसाशी जिव्हाळ्याचे नाते आहे.

एक काळ असा होता की, चिमण्यांच्या चिवचिवाटाने घराचे अंगण गजबजलेले असायचे. जनावरांच्या गोठ्यात, घराच्या वळचणीला, ओसरीमध्ये, एखाद्या फोटोच्या मागे, अंगणातील झाडावर चिमणीने बनवलेले घरटे हमखास दिसायचे.  आज ग्रामीण भागात चिमणी आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करीत आहे. अलीकडे ग्रामीण भागाचे हळूहळू नागरीकरण होत चालले आहे. शहराप्रमाणे खेडीसुद्धा बदलत चालली आहेत. मातीच्या विटांनी बनवलेल्या घरांची जागा आता सिमेंटच्या भिंतीनी घेतली आहे. तुसाच्या किंवा काडाच्या छपरांची जागा आता पत्र्यांनी घेतली आहे. तर घराच्या कौलारू छताची जागा सिमेंच्या स्लाबने घेतली आहे. घराच्या आसपास असलेली झाडे कमी झाली आहेत. या साऱ्या बदलामुळे खेडेगावातही चिमण्यांना निवाऱ्याची जागा मिळणे दुरापास्त झाले आहे.  पारंपारिक शेती सम्पुष्टात आली असून त्याची जागा आता अपारंपरिक पिकांनी घेतली आहे. खरीपात बाजरी आणि रब्बी हंगामात ज्वारी हे पिक हमकास घेतले जायचे. चिमण्यांचे ते आवडते खाद्य असल्याने थवेच्या थवे या पिकांचा फडश्या पडायचे.  पण माणूस पैश्याच्या लोभाने अपारंपरिक पिक पद्धतीचा अवलंब करीत असल्याने चिमण्यांना अन्न मिळणे कठीण झाले आहे.  त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्यानेच त्यांचे जीवन असह्य झाले आहे. पूर्वीसारखी माणसं पक्ष्यांसाठी चारापाण्याची व्यवस्था करताना दिसत नाहीत. कीटकनाशकांचा बेसुमार वापर असल्यामुळे अशे कीटक पक्ष्यांच्या खाण्यात आल्यामुळेही अनेक पक्ष्यांना जीवाला मुकावे लागत आहे. एकूणच काय ग्रामीण भागात हमकास दिसणारी चिमणी नजरेआड होत आहे हे मात्र नक्की. अशा अनेक कारणांनी आपल्यावर अशी वेळ येणार आहे की रुसलेल्या चिमणीला माझ्या अंगणी ये ग चिमणाबाई म्हणत वाट पहात बसवे लागेल.  पण ती येईल कि नाही हे मात्र सांगता येणार नाही.

 पक्ष्यांचे अस्तित्व सम्पुष्टात येईल !



चालू दशकाच्या सुरुवातीपासूनच  देशभरात चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याची माहित अनेक पक्षी अभ्यासक संस्था व संशोधकांनी केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे. जगभरात सिमेंटची जंगले उभी रहात असताना नैसर्गिक जंगले व पक्ष्यांसाठी आवश्यक असणारा अधिवास दिवसे न दिवस  झपाट्याने कमी नष्ट होत चालेले दिसत आहेत. हे अत्यंत विदारक वास्तव आहे. त्यामुळे पक्ष्यांना निवारा व घरटी बांधण्यासाठी अडगळीची किंवा सुरक्षित जागा मिळत नाही. इमारतींना लावलेल्या काचेच्या मोठमोठ्या  तावदानामुळे पक्ष्यांना घरटी बनवता येत नाहीत. चिमणी हा मानवी वसाहती जवळ सतत वावरणारा पक्षी असून मिळेल त्या ठिकणी आडोश्याला घरटे बनवण्याचा प्रयत्न करीत असते. अशा इमारतीत स्वच्छतेचे काम वारंवार केले जाते त्यामुळे चिमण्यांनी घरटी  बनवण्यासाठी आणलेले गवत-कडी व इतर साहित्य काढून टाकले जाते व त्यांची घरटी उध्वस्त केली जातात व त्यांचा मुक्त जगण्याचा हक्क व अधिकार आहे त्या चिमुकल्या जीवाना आपली पिढी पुढे नेण्यापासून वंचित ठेवले जात असल्याने चिमण्यांची संख्या घटत चालली असल्याचे निदर्शनास आले आहे.  

चिमण्याचे मुख्य अन्न हे किडे, छोटे-छोटे कीटक व धान्य आहे. बंदिस्त गटारे व घरातील वाया जाणारे अन्न पक्ष्यांना मिळत नाही. उरलेले खाद्य पदार्थ प्लास्टिक पिसाव्यामध्ये भरून ते कचराकुंडीत टाकले जाते. त्यामुळे पक्षांना धान्य तर सोडाच पण वाया जाणारे  अन्नही न मिळाल्याने वणवण भटकण्याची  व उपासमारीची वेळ पक्ष्यांवर येते. शहरामध्ये असलेली हिरवळ कमी झाली आहे. मोठमोठाली झाडे तोडून मोकळी मैदाने अथवा इमारती बनवण्यात आल्यामुळे नैसर्गिक अधिवासही मिळेनासा झाला आहे. वाढत्या औध्योगिकीकरण प्रदूषणाची समस्या खूप गंभीर होत चालली आहे.  जगभरातून चिमण्यांचे अस्तित्व सम्पुष्टात येईल की काय असे वाटू लागले आहे.  पर्यावरणाचा होत असेलेला  ऱ्हास, प्रचंड प्रमाणात होणारी जंगल तोड, नैसर्गिक चक्रामध्ये वाढता मानवी हस्तक्षेप, प्रदूषण, शिकार, भक्षक प्राणी व पक्षी, खेड्यांचे होणारे नागरीकरण, शहरातील गगनचुंबी इमारती, ही काही  चिमण्यांच्या व इतर पक्ष्यांच्या संख्येवर परिणाम करणारे घटक आहेत.

काही अभ्यासकांच्या  मते मोबाईल टॉवरच्या रेडीएशन, चुंबकीय लहरींचा प्राणी पक्ष्यांवरच नव्हे तर मानवी जीवनावरही अत्यंत अनिष्ठ परिणाम होत आहेत. या लहरीमुळे पक्षांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याचे सांगण्यात येते. अनेक वेळा अशा टॉवरवर कावळ्यांची घरटी पहावयास मिळतात. एवढेच नव्हे तर पिलेही या घरट्यात जन्माला आलेली आढळून आले आहे. घारी, शराटी सारखे पक्षी रात्रीच्या वेळी या टॉवरवर विसाव्याला येत असतात हे अनेक निरीक्षकांनी नमूद केले आहे.  मग त्यांच्यावर या लहरींचा परिणाम होत नसेल का? असा प्रश्न मनात येतो. या बाबतीत सखोल संशोधनाची गरज आहे. मोबाईल लहरींचा परिणाम होत ही असेल. पण निसर्गात वाढता मानवी हस्तक्षेप हेच मूळ कारण आहे. मानवी विकास हाच केंद्रबिंदू मानुन जगभरात प्रचंड प्रमाणावर नैसर्गिक साधन सामुग्रीची लुट चालू आहे. पर्यावरणातील असा एकही घटक उरला नाही जेथे मानवाने आपला हात ढवळला नाही. त्यामुळे प्राणी पक्ष्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट झाले आहेत किंवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.  

 चिमणी दुर्मिळ होत आहे.

                                                            
    फोटो - डॉ. विधिन कांबळे (Photo - Dr. Vidhin Kamble) 

हजारो वर्षापासून मानवी वसतिच्या आसपास वावरणारा चिमणी हा इवलासा पक्षी आहे.  चिमणी हा मिश्रहारी पक्षी आहे. धन-धान्या बरोबरच छोटे-छोटे कीटक व आल्या खून आपली गुजराण करीत असतो. जुन्या काळी शेकडो चिमण्या ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही आढळून यायच्या. खेड्यातील घरे मातीच्या भेंड्यांची असायची. घरांचे छप्पर गव्हाचे काड, पाचट, किंवा पानकणीस यांनी शाकारलेली असायची. मोठमोठे गोठे असयाचे, शेळ्या – बकऱ्यासाठी वाडगे असायचे. त्यामुळे चिमण्यांना घरटी बनवण्यासाठी मुबलक जागा उपलब्ध असायची. त्यामुळे मानवाचे फार जवळचे नाते होते. घराच्या जवळ परडे असायचे. त्यामध्ये छोटेसे छपर असायचे. परड्यात जनावरांना सावलीसाठी एखादे कडूलिंबाचे किंवा बाभळीचे झाड असायचे. घरांच्या आसपास असलेल्या झाडावर, छपरांच्या वळचणी, ओसरीमध्ये लावलेल्या फोटोंच्या मागे, भिंतीना असलेल्या बिळामध्ये, किंवा मोठ मोठेल्या वाड्यांना आवर्जून ठेवण्यात आलेल्या बिळामध्ये घरटे करायच्या. एकूणच काय चिमणीला मानवी अभय होते. म्हणूनच चिमणीसुद्धा निर्भिडपणे माणसाबरोबर रहात होती. गवत कड्या, कापूस, सुतळ्या, दोरे, पिसे इत्यादी साहित्य वापरून चिमणी घरटे बनवायची. चिमणा- चिमणी मिळून जोडीन घरटे बांधायची. मग त्यात चिमणी अंडी घालायची. त्या अंड्यातून महिन्याभरात पिल्ले बाहेर पडायची. मग हळूच बारीक चालांचा आवाज व्हावा तसं चिमणीच्या घरट्यातून पिलांचा आवाज यायला लागायचा. चिमणा- चिमणी चारा घेऊन आले की हा आवाज खूप जोरजोरात यायचा. चारा खावू घालून आई-वडील निघून गेल्यावर हा आवाज शांत व्हायचा. काही दिवसांनी चिमणी आपल्या चिमुकल्या बाळांना घेऊन अंगणात उतरायची. चोचीत अन्नचा छोटासा कण घेऊन ती आपल्या पिलांजवळ टूण –टूण उड्या मारत आली कि पिल्ल आपली इवलीशी चोच उघडून तिच्या पुढे ‘आ’ वासून बसायची. मग चिऊताई आपल्या पिलांना भरवायची. हे दृश्य पहाताना खूप मजा यायची. पण आता हे सगळे इतिहासजमा झाले आहे. ना चिवचिवट, ना पिलांचा चाळासारखा आवाज.

थव्याने अंगणात येणारी चिमणी माणसाच्या नजरेआड कधी झाली हे जाणवले नाही. चिवचिवाट करणारी चिमणी आज खूपच दुर्मिळ झाली असून एखाद दुसरी चिमणी नजरेला पडत आहे. मानवी जीवनाशी एकरूप झालेली तीच चिमणी, आज शेवटच्या घटका मोजते आहे.

 चिमण्यांची शिवता-शिवत

आठवडी बाजाराला आई-वडील जाताना ‘घरातून कुठे जाऊ नकोस’ असं म्हणून जायचे.  जेवण कर.! उन्हा-तान्हात पिरू नको. शेळीला गवत घाल. गायला पाणी दाखव. घरात कुणाला घेऊ नकोस. दार उघडे ठेऊन कुटे जाऊ नकोस. अशा अनेक सूचना आणि उपदेश करून ते घरातून बाहेर पडायचे. आई-वडील घरातून बाहेर पडले रे पडले की आम्ही मित्रमंडळी आमच्या घरी एकत्र यायचो. अंगणात असलेल्या वडाच्या झाडावर सूर पारंब्याचा खेळ चालायचा.  दिवसभर नुसता धिंगाणा चालायचा. आमच्या घरात धान्याच्या पोत्यांची थप्पी भिंतीला लावलेली असायची. कोंबडीने चोची मारून धान्याची पोटी फोडलेली असायची. त्या पोत्यातून धान्य सांडायचं. आणि ते धान्य टिपण्यासाठी आमच्या घरात खूप चिमण्या यायच्या. त्यांना हाकलून लावताना नुसता वैताग यायचा. एक दिवस आई-वडील बाजाराला गेले असताना माझा एक मित्र घरी आला. मी आपला चिमण्या हाकलून लावत होतो. चिमण्या थोडावेळ बाहेर उडून जायच्या आणि पुन्हा घरात शिरायच्या. माझा मित्रही या गोष्टीने वैतागला होता. त्याने एक शक्कल लढवली. दाराच्या कोयंड्याला बाहेरून लांब दोरी बांधली आणि बाहेरच आडोश्याला दडून बसला.  दार उघडे असल्यामुळे चिमण्या घरात जाऊ लागल्या.  घरात कुणीच नाही असं त्यांना वाटल्याने धान्य खाण्यात त्या खूपच तल्लीन झाल्या होत्या. घरात चांगल्या २५ -३० चिमण्या शिरल्या असाव्या.  थोडा वेळ जाऊ दिला. माझा मित्र दोरी हातात धरून बसला  होत. एकदम काही कळायच्या आत झटक्यात त्याने दोरी ओढून दरवाजा बंद केला. बाजूच्या खोलीतून मी आणि माझा मित्र घरात शिरलो.  अचानक दर बंद झाल्यामुळे आणि घरात पूर्ण अंधार झाल्यामुळे चिमण्या अगदी भेदरून गेल्या होत्या. त्या घरात इकडे तिकडे उडू लागल्या. अंधार असल्यामुळे त्या भिंतीला धडकत होत्या. आणि फडफड करत जमिनीवर पडायच्या. दाराला असलेल्या फटीतून बाहेरचा उजेड घरात येत होता. त्या अंधुक प्रकाशात चिमण्यांची धडपड आणि फडफड आम्हाला जाणवत होती. मग माझ्या मित्राने एक शक्कल लढवली. त्याने अंगातला शर्ट काढला व तो हवेत गरगर फिरवून चिमण्यांच्या मागे धावू लागला.  चिमण्या मात्र भेदरल्या होत्या. त्या आणखीनच भेदरल्या व स्वतःला वाचवण्यासाठी घरभर उडू लागल्या.  शेवटी इतक्या दमल्या की व्याकुळ होऊन त्या भिंतीला धडकून जमिनीवर पडू लागल्या. जणू त्यांच्या पंखातील बळच गळून पडले. काही चिमण्या पोत्यांच्यामागे पडल्या. काही चिमण्या कपाटाच्या मागे तर काही जमिनीवरच पंख पसरून पडल्या. मग मित्राने मला एक मोठी पाटी  आणायला सांगितली. त्या पाटीवर एक पोते झाकले. मग आम्ही दोघे चिमण्या पकडू लागलो. एक-एक चिमणी पकडून पाटीत टाकायचो आणि पुन्हा हळूच झाकायचो.  सगळ्या चिमण्या पकडल्या खरं. पण आम्ही दोघेही घामाघूम झालो होतो. मी दरवाजा उघडला. चिमण्या ठेवलेली पाटी दोघांनी दोन्हीकडे  धरून घरातून अंगणात आणली. आणि मोठमोठ्याने आजूबाजूच्या मित्रांना हाक मारू लागलो. ‘आम्ही चिमण्या पकडल्या, सगळ्यांनी बघायला या’.! आमचा आवाज ऐकून पटापटा सगळे मित्र आले.  मी हळूच चिमण्या ठेवलेल्या पाठीत हात घातला. तर पाठीत सगळ्या चिमण्या घामाघूम झाल्याचे मला जाणवले. तो स्पर्श मला कसा तरीच वाटला. मीपण थोडासा मनातून चरकलो व हात चटकन बाहेर काढला. माझ्या मित्राने सगळ्यांना बाजूला सरकायला सांगितले. मी आणि माझ्या मित्राने पाटीवर झाकलेल पोते दोन बाजूला धरून उचलले. तसं सगळ्या चिमण्या भुर्रकन उडून गेल्या.  तो तेवढाच क्षण पण आम्हा सर्व बालमित्रांना आनंदी करून गेला.

संध्याकाळी आई बाबा आले. त्यांनी आणलेला खाऊ खात-खात चिमण्या कशा पकडल्या याची माहिती देऊ लागलो. मी चिमण्या पकडल्या हे ऐकल्यावर आईला एवढा राग आला की तिने मला दोन-चार शिव्या हासडल्या.  ‘मुडध्या’ चिमण्या गरीब असतात. त्यांच्या वाटेला पुन्हा जाऊ नकोस. मी पण आईवर चिडलो आणि म्हणालो, ‘त्या आपल्या पोत्यातील धान्य खातात.! कितीही हाकलून लावलं तरी जात नाहीत ! म्हणून त्यांना अद्दल घडवली. मग तर आई खूपच चिडली.  कितीसा रे त्यांचा जीव. किती खाल्ल असेल त्यांनी. पोतेभर तर नसेल खाल्ले ना. एखदाच सांगून ठेवते. पुंन्हा चिमण्यांना हात लावलास तर गाठ माझ्याशी आहे.

एके दिवशी मी आईला विचारले.  आई ! का ग चिमणीला  हात लावायचा नसतो. आई थोडी शांत बसली. तिने  थोडा विचार केला. मला जवळ बोलावले आणि सांगू लागली. तिने सांगितलेले कारण ऐकून मला धक्काच बसला. हे अस असू शकत यावर माझा क्षणभर  विश्वासच बसला नाही. आई म्हणाली, चिमणीला जर माणसाचा स्पर्श झाला तर तिचे बाकीचे भाऊबंद त्या चिमणीला आपल्या कळपातून काढून टाकतात. तिला वाळीत टाकतात. त्या चिमणीला सगळ्या चिमण्या घेरून टोच्या मारतात  टोचून-टोचून तिला रक्तबंबाळ करतात. अगदी जीव जाईपर्यंत तिला टोचतात. मग ती मारून जाते.हे ऐकून मला खूपच सुन्न झाल्यासारखं वाटलं. माणसासारखे पक्षीसुद्धा शिवता-शिवत मानतात.  कदाचित आपण आपला धर्म आणि संस्कृति जतन केली पाहिजे. आपण आपल्या मर्यादेत राहिले पाहिजे हाच तो संदेश कदाचित यातून पक्षी देत असावेत. हे  असं वर्तन पक्षांमध्ये कसे होते ही अनाकलनीय आहे. नेमकं  कुणी कुणाचे अनुकरण केले हे सांगणे अवघड असले तरी हे  माणूस आणि पक्षामधील एक खरं वास्तव आहे हे समजले.

लहानपण आणि चिमणी

आमची पिढी खूप नशीबवान आहे. कारण आम्ही सगळी नैसर्गिक सुखं भोगली, अनुभवली आणि डोळेभरून पहिली. सुट्टीच्या दिवशी गावाच्या कडेने झुळूझुळू वहाणाऱ्या ओढ्यात मनमुराद डुंबण्याचा आनंद घेतला. दिवसभर उपाशी पोटाने नदी-ओढ्यात खेकडे-मासे पकडत काठावर असणाऱ्या जंगली झाडांची फळे खाण्यासाठी केलेली पायपीट केली. आणि उशीर झाला म्हणून घाबरत घाबरत  हळूच घरात शिरायचो. दिवसभर उपाशी म्हणून आईच्या शिव्या खाव्या लागायच्या. मग आईच ‘जेवण वाढलय’  म्हणत जेवायला बसवायची. सगळं कसं छान-छान असायचं.

“चिव चिव चिमणी  चारा खा पाणी पी भूरर  उडून जा”  ही एवढीशी गाण्याची ओळ माझी मुलगी म्हणायची. आम्ही ही टाळ्या वाजून तिचे कौतुक करायचो. तिलाही आपण काही तरी छान गाणं म्हटलो आहोत असं वाटायचे आणि ती गळ्यात येऊन पडायची. खरं तर तिला चिमणी कसली असते हे माहितही न्हवते तरीही ती गाणे म्हणायची आणि आम्ही तिचे कौतुक करायचो. एकूणच काय चिमणी असली काय आणि नसली काय, तीचं अस्तित्व आपल्यातून संपणार नाही. 

"चिऊ ताई चिऊ ताई दार उघड" ही गोष्ट आपल्या लहानपणी सर्वांनी ऐकली असेल. असा एकही व्यक्ती नसेल ज्याने हि गोस्ट ऐकली

 चिमण्यांच्या बाबतीत कुठलेही असे ठोस संशोधन नाही. त्यामुळे कॉमन बर्ड मॉनिटरींग ऑफ इंडिया या मोहिमेच्या माध्यमातून गेल्या आठ वर्षांपासून चिमण्यांचे सातत्याने निरीक्षण करून त्यांची संख्या रोडवण्यामागची कारणे शोधत आहे. यात काही अंशी यशही आले आहे. सर्वसाधारणपणे १८ सर्वसाधारण (सहज दिसणारे) पक्षी देशभरात आढळतात. गेल्या दोन वर्षांमध्ये केलेल्या राष्ट्रीय गणनेत चिमणी यात संख्येनुसार चौथ्या स्थानी आढळली. कधीकाळी हीच चिमणी पहिल्या क्रमांकावर होती. तिची जागा आता कबुतराने घेतली आहे.


का होतेय चिमणाबाई दुर्मिळ?

आपली पूर्वीची जीवनशैली चिमण्यांना पूरक होती. महिला अंगणात धान्य निवडायच्या, तेव्हा चिमण्या गोळा व्हायच्या. धान्याबरोबरच चिमण्या किडेही खायच्या. घरांत फोटो टांगलेले असायचे. त्यांच्यामागे चिमण्या घरटी करून राहात. दहा-वीस वर्षांत हे सगळे बदलले. धान्य प्लास्टिकच्या पिशवीत आले. त्यामुळे चिमण्यांना सहज अन्नही मिळत नाही. डास होऊ नयेत म्हणून जाळी असते. पूर्वी वाड्यांमध्ये, कौलारू घरांमध्ये मोकळ्या जागा असायच्या. आताच्या बांधकामात चिमण्यांना राहता येईल, एवढीही जागा नसते. मोबाइल टॉवरमधून निघणारी रेडिओ फ्रिक्वेन्सीहीही चिमण्यांसाठी घातक ठरते. पिकांमध्ये पेस्टिसाइडचा वापर होऊ लागल्याने किडे-मुंग्यांची संख्या कमी झाली. त्यामुळेही चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे.

चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होण्यामागे मोबाइल टॉवरची भूमिका मोठी आहे. त्यामुळे पक्ष्यांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होत आहे. त्यांची अंडी घालण्याची क्षमतादेखील त्यामुळे कमी होत आहे. गिधाडांना ज्याप्रमाणे वाचविण्यासाठी मोहीम हाती घ्यावी लागली, त्यासारखी एखादी मोहीम आज चिमण्यांसाठी हवी आहे.

"चिऊ ताई चिऊ ताई दार उघड" अशी गोष्ट असो किंवा "चिमणी ये दाणा खा आणि भुर्र दिशी उडून जा" असे एखादे गीत असो, ही चिमणी जन्मताच आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेली असते. आजही मला माझ्या शहराच्या मध्यवस्तीतल्या घरात जाग येते ती पहाटेच्या चिमण्यांच्या किलबिलाटाने. माझ्या घराच्या अंगणात असलेल्या पारिजातकाच्या झाडावर दिवसभर पंचवीस-तीस चिमण्यांचा राबता असतो. आई नित्याने त्यांच्यासाठी एका भांड्यात पाणी ठेवते, धान्य टाकते. लाजत बुजत एक एक करत अंगणात उतरून धान्यावर ताव मारणाऱ्या चिमण्यांचा हा थवा पहिला की घराचे आंगण कसे भरून गेल्यासारखे वाटते.

चिऊताई,चिऊताई दार उघड...., ये गं चिऊ...., अशा चिऊताईच्या गोड गोष्टी ऐकत आपण सर्वच लहानाचे मोठे झालो. लहान बाळाला घास भरवताना आजी, आई, ताई हा चिऊचा घास म्हणून भरवायची. जणू ती आपल्या घरातीलच एक सदस्य आहे. पर्यावरणाच्या सुरक्षा साखळीत महत्त्वाचा घटक असलेल्या या चिमणीचे अंगण, परसातील झारावर, घराच्या ओसरीत, फोटोमागे हमखास घरटे असायचेच. पण, एव्हाना हा लहान पक्षी सिमेंटच्या जंगलात दिसेनासा झाला आहे.

ग्रामीण भागात अजूनही आढळणारी चिमणी, शहरातील इमारतींच्या जंगलात जशी लोप पावत आहे, तशीच दिवसेदिवस दिसेनाशी होत आहे. मातीची घरे आता नावाला उरली आहेत. बांबूच्या ओसऱ्या आता फारच कमी उरल्या आहेत. अंगण परसातील घनदाट झाडी, वेली, फुलांचे मळेही दिसेनासे झाले आहेत. यांच्याच आधाराने चिमण्यांची सुमारे १० वर्षांपूर्वीपर्यंत मनुष्याभोवती वागणे असायचे. मात्र आता महिन्या दोन महिन्यातून एखादवेळी एखादी चिमणी दृष्टीस पडते. त्यावेळी आपल्या मुलांना ती बघ चिमणी म्हणून एखादी दुर्मिळ गोष्टीप्रमाणे ती दाखवावी लागते.

आमची जुनी पिढी भाग्यवानच म्हणावी लागेल! आम्ही चिमण्यांना अंगणात दाणे वेचताना पाहिले आहे. झाडांवर, रस्त्यांच्या कडांवर, टेलिफोनच्या वायरीवर समूहाने मुक्त विहार करताना, कधी चिवचिवाट तर कधी नुसताच लपंडाव. शाळकरी मुलांना तर चिमण्यांचा फारच लळा असे. बांबूच्या कामटीने टोपली तिरकी उभी करायची. कामटीला दोरी अडकवायची. टोपलीखाली ज्वारी-बाजरीचे दाणे टाकायचे. चिमण्या दाणे वेचत असताना दोरी ओढून टोपली खाली पाडायची. मग हळूच हात घालून एकेक चिमणी बाहेर काढायची व निळ्या, काळ्या, लाल रंगाच्या शाईंनी त्यांचे पंख रंगवायचे. मुलांनी त्यांची त्यांची चिमणी रंगानुसार ठरवायची व चिमण्यांना उडवून द्यायचे. आमचा हा खेळ थोडासा विक्षिप्त वाटत असला तरी त्यात चिमण्यांचा घातपात हा हेतू नव्हता. मुलांचे मानस चिमण्यांशी जवळीक साधण्याचे असायचे. चिमण्या हा आमच्या बाल जीवनाचा अविभाज्य घटकच होता म्हणा ना!

पूर्वी, अंगणात वाळवणे घातलेली असायची. धान्य निवडताना त्यातील अळ्या लिलया बाहेर फेकल्या जात. चिमण्या त्या वेचून फस्त करत. वळचणीला घरटे करून राहणाऱ्या चिमण्यांना अळ्या, कीडे, पाली इत्यादी खाद्य भरपूर उपलब्ध असायचे.

घरात चिमण्यांनी उच्छाद मांडला म्हणून त्यांची घरटी खरडून काढून अंगणात जाळून टाकली तेव्हा त्यांना शांत वाटू लागले.

 या चिमण्यांनो,

परत फिरा रे….
घराकडे आपुल्या…..

 मा.ग. दि. माडगूळकर यांचे गाणे आजच्या दिवसाला लागू होते. हल्ली या चिमण्यांनो असेच म्हणावे लागते.

 

No comments:

साळुंकी पक्षी : Indian mayna (Acridotheres tristis)

साळुंकी पक्षी  इंग्रजी नाव : Indian mayna   शास्त्रीय नाव : Acridotheres tristis फोटो - डॉ. विधिन कांबळे (Photo - Dr. Vidhin Kamble)  ...