Friday, October 15, 2021

माझ्या अंगणी ये ग चिमणाबाई ! प्रा. डॉ. विधिन कांबळे

                                                            माझ्या अंगणी ये ग चिमणाबाई !

प्रा. डॉ. विधिन कांबळे

प्राणिशास्त्र विभाग, सांगोला महाविद्यालय, सांगोला




लहानपणी चिऊ-काऊच्या गोष्टी ऐकल्याशिवाय लहान बाळाचा घास घश्याखाली उतरत नसे. “एक घास चिऊचा” “एक घास काऊचा” ऐकत ऐकत लहानाचे मोठे झालो त्या चिमणीचे आणि कावळ्याचे आपल्या बालपणावर मोठे उपकार आहेत. कारण चिमणीकडे बघत-बघत लहानाचे मोठे कधी झालो हे कळले नाही. पण आज तीच मंडळी आज आंधळी झाल्यासारखी वाटतात. कारण आपले अस्तित्व टिकवण्यासाठी  धड्पाडणाऱ्या चिमुकल्या चिमणीचा आवाज त्यांच्या कानाला ऐकू येईनासा झालाय.   चिमणी आणि कावळ्याचे माणसाशी हजारो वर्षाचे नाते आहे.  इतर पक्ष्यापेक्षा चिमणी आणि कावळ्याचे अस्तित्व व वास्तव्य माणसाच्या आसपास दिसून येते. म्हणूनच त्यांचे माणसाशी जिव्हाळ्याचे नाते आहे.

एक काळ असा होता की, चिमण्यांच्या चिवचिवाटाने घराचे अंगण गजबजलेले असायचे. जनावरांच्या गोठ्यात, घराच्या वळचणीला, ओसरीमध्ये, एखाद्या फोटोच्या मागे, अंगणातील झाडावर चिमणीने बनवलेले घरटे हमखास दिसायचे.  आज ग्रामीण भागात चिमणी आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करीत आहे. अलीकडे ग्रामीण भागाचे हळूहळू नागरीकरण होत चालले आहे. शहराप्रमाणे खेडीसुद्धा बदलत चालली आहेत. मातीच्या विटांनी बनवलेल्या घरांची जागा आता सिमेंटच्या भिंतीनी घेतली आहे. तुसाच्या किंवा काडाच्या छपरांची जागा आता पत्र्यांनी घेतली आहे. तर घराच्या कौलारू छताची जागा सिमेंच्या स्लाबने घेतली आहे. घराच्या आसपास असलेली झाडे कमी झाली आहेत. या साऱ्या बदलामुळे खेडेगावातही चिमण्यांना निवाऱ्याची जागा मिळणे दुरापास्त झाले आहे.  पारंपारिक शेती सम्पुष्टात आली असून त्याची जागा आता अपारंपरिक पिकांनी घेतली आहे. खरीपात बाजरी आणि रब्बी हंगामात ज्वारी हे पिक हमकास घेतले जायचे. चिमण्यांचे ते आवडते खाद्य असल्याने थवेच्या थवे या पिकांचा फडश्या पडायचे.  पण माणूस पैश्याच्या लोभाने अपारंपरिक पिक पद्धतीचा अवलंब करीत असल्याने चिमण्यांना अन्न मिळणे कठीण झाले आहे.  त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्यानेच त्यांचे जीवन असह्य झाले आहे. पूर्वीसारखी माणसं पक्ष्यांसाठी चारापाण्याची व्यवस्था करताना दिसत नाहीत. कीटकनाशकांचा बेसुमार वापर असल्यामुळे अशे कीटक पक्ष्यांच्या खाण्यात आल्यामुळेही अनेक पक्ष्यांना जीवाला मुकावे लागत आहे. एकूणच काय ग्रामीण भागात हमकास दिसणारी चिमणी नजरेआड होत आहे हे मात्र नक्की. अशा अनेक कारणांनी आपल्यावर अशी वेळ येणार आहे की रुसलेल्या चिमणीला माझ्या अंगणी ये ग चिमणाबाई म्हणत वाट पहात बसवे लागेल.  पण ती येईल कि नाही हे मात्र सांगता येणार नाही.

 पक्ष्यांचे अस्तित्व सम्पुष्टात येईल !

चालू दशकाच्या सुरुवातीपासूनच  देशभरात चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याची माहित अनेक पक्षी अभ्यासक संस्था व संशोधकांनी केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे. जगभरात सिमेंटची जंगले उभी रहात असताना नैसर्गिक जंगले व पक्ष्यांसाठी आवश्यक असणारा अधिवास दिवसे न दिवस  झपाट्याने कमी नष्ट होत चालेले दिसत आहेत. हे अत्यंत विदारक वास्तव आहे. त्यामुळे पक्ष्यांना निवारा व घरटी बांधण्यासाठी अडगळीची किंवा सुरक्षित जागा मिळत नाही. इमारतींना लावलेल्या काचेच्या मोठमोठ्या  तावदानामुळे पक्ष्यांना घरटी बनवता येत नाहीत. चिमणी हा मानवी वसाहती जवळ सतत वावरणारा पक्षी असून मिळेल त्या ठिकणी आडोश्याला घरटे बनवण्याचा प्रयत्न करीत असते. अशा इमारतीत स्वच्छतेचे काम वारंवार केले जाते त्यामुळे चिमण्यांनी घरटी  बनवण्यासाठी आणलेले गवत-कडी व इतर साहित्य काढून टाकले जाते व त्यांची घरटी उध्वस्त केली जातात व त्यांचा मुक्त जगण्याचा हक्क व अधिकार आहे त्या चिमुकल्या जीवाना आपली पिढी पुढे नेण्यापासून वंचित ठेवले जात असल्याने चिमण्यांची संख्या घटत चालली असल्याचे निदर्शनास आले आहे. 

चिमण्याचे मुख्य अन्न हे किडे, छोटे-छोटे कीटक व धान्य आहे. बंदिस्त गटारे व घरातील वाया जाणारे अन्न पक्ष्यांना मिळत नाही. उरलेले खाद्य पदार्थ प्लास्टिक पिसाव्यामध्ये भरून ते कचराकुंडीत टाकले जाते. त्यामुळे पक्षांना धान्य तर सोडाच पण वाया जाणारे  अन्नही न मिळाल्याने वणवण भटकण्याची  व उपासमारीची वेळ पक्ष्यांवर येते. शहरामध्ये असलेली हिरवळ कमी झाली आहे. मोठमोठाली झाडे तोडून मोकळी मैदाने अथवा इमारती बनवण्यात आल्यामुळे नैसर्गिक अधिवासही मिळेनासा झाला आहे. वाढत्या औध्योगिकीकरण प्रदूषणाची समस्या खूप गंभीर होत चालली आहे.  जगभरातून चिमण्यांचे अस्तित्व सम्पुष्टात येईल की काय असे वाटू लागले आहे.  पर्यावरणाचा होत असेलेला  ऱ्हास, प्रचंड प्रमाणात होणारी जंगल तोड, नैसर्गिक चक्रामध्ये वाढता मानवी हस्तक्षेप, प्रदूषण, शिकार, भक्षक प्राणी व पक्षी, खेड्यांचे होणारे नागरीकरण, शहरातील गगनचुंबी इमारती, ही काही  चिमण्यांच्या व इतर पक्ष्यांच्या संख्येवर परिणाम करणारे घटक आहेत.

काही अभ्यासकांच्या  मते मोबाईल टॉवरच्या रेडीएशन, चुंबकीय लहरींचा प्राणी पक्ष्यांवरच नव्हे तर मानवी जीवनावरही अत्यंत अनिष्ठ परिणाम होत आहेत. या लहरीमुळे पक्षांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याचे सांगण्यात येते. अनेक वेळा अशा टॉवरवर कावळ्यांची घरटी पहावयास मिळतात. एवढेच नव्हे तर पिलेही या घरट्यात जन्माला आलेली आढळून आले आहे. घारी, शराटी सारखे पक्षी रात्रीच्या वेळी या टॉवरवर विसाव्याला येत असतात हे अनेक निरीक्षकांनी नमूद केले आहे.  मग त्यांच्यावर या लहरींचा परिणाम होत नसेल का? असा प्रश्न मनात येतो. या बाबतीत सखोल संशोधनाची गरज आहे. मोबाईल लहरींचा परिणाम होत ही असेल. पण निसर्गात वाढता मानवी हस्तक्षेप हेच मूळ कारण आहे. मानवी विकास हाच केंद्रबिंदू मानुन जगभरात प्रचंड प्रमाणावर नैसर्गिक साधन सामुग्रीची लुट चालू आहे. पर्यावरणातील असा एकही घटक उरला नाही जेथे मानवाने आपला हात ढवळला नाही. त्यामुळे प्राणी पक्ष्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट झाले आहेत किंवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. 

त्याचाच परिणाम म्हणून की काय थव्याने अंगणात येणारी चिमणी माणसाच्या नजरेआड कधी झाली हे जाणवले नाही. चिवचिवाट करणारी चिमणी आज खूपच दुर्मिळ झाली असून एखाद दुसरी चिमणी नजरेला पडत आहे. मानवी जीवनाशी एकरूप झालेली तीच चिमणी, आज शेवटच्या घटका मोजते आहे. महाराष्ट्राचे थोर गीतकार व लेखक ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेल्या व स्वर सम्राज्ञी लातमंगेशकर यांनी गायलेले

या चिमण्यांनो, परत फिरा रे….
घराकडे आपुल्या…..

दहा दिशांनी येईल आता अंधाराला पूर
अशा अवेळी असू नका रे आईपासून दूर
चुकचुक करिते पाल उगाच चिंता मज लागल्या

हे अत्यंत सुरेल आणि भावनिक असे  फार जूने भावगीत आज सर्वांनी गायले पाहिजे.  एवढेच नाही तर ते प्रत्येकाने आंगिकारले पाहिजे असे मला वाटते. गदिमानी त्यांच्या गीतात दहा दिशांनी येईल आता अंधाराला पूर असे भीषण भविष्य मांडले होते ते आज अगदी तंतोतंत खरे ठरले आहे. आज  फक्त  चिमणीच नाही  तर  हजारो पक्ष्यांच्या अस्तित्वात अंधकार दाटला आहे.  पक्षांचे अस्तित्व व अंधकार  दूर करायचं असेल तर माणूस म्हणून आपण जबाबदारी स्वीकारली पाहिजे व त्यासाठी प्रयत्नही केले पाहिजेत. तरच उद्याचा उगवणारा सूर्य आपली येणारी पिढी पाहू शकेल.

 

 

No comments:

साळुंकी पक्षी : Indian mayna (Acridotheres tristis)

साळुंकी पक्षी  इंग्रजी नाव : Indian mayna   शास्त्रीय नाव : Acridotheres tristis फोटो - डॉ. विधिन कांबळे (Photo - Dr. Vidhin Kamble)  ...